नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून निधन झाल्यानतंर एकीकडे संपूर्ण देश दुःखात आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर देखील या घटनेविषयी दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तिकडे चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात खोडसाळपणा सुरूच ठेवला आहे. या दुर्घटनेसाठी भारतीय लष्करातील त्रुटी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
चीनने ग्लोबल टाईम्समधील लेखात बिपिन रावत यांच्या निधनावर बोलताना यातून भारतीय लष्करातील शिस्तीची कमतरता तसेच लढण्याची अपूर्ण तयारी दिसत असल्याची गरळ ओकली आहे. तसेच भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला असून हा दीर्घकाळ राहील असेही चीनने म्हटले आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये यावेळी बिपिन रावत यांचा उल्लेख चीनविरोधी असा करण्यात आला आहे. बिपिन रावत यांच्या निधनानंतरही भारताचा चीन सीमेवरील आक्रमक पवित्रा कायम असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे ग्लोबल टाइम्सने सांगितले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचा हवाला देताना, ग्लोबल टाइम्सने या दुर्घटनेसाठी मानवी चूकच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
लष्कर तज्ज्ञ Wei Dongxu यांच्या म्हणण्यानुसार, Mi-17V5 हे Mi-17 ची सुधारित आवृत्ती असून त्यामध्ये अधिक शक्तिशाली इंजिन्स तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहेत. यामुळे ते अधिक विश्वासार्ह आहे. पण भारतीय लष्करात अनेक हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. यामध्ये विदेशी तंत्रज्ञान वापरत देशांतर्गत निर्मिती तसेच विकसित करण्यात आलेले तसंच अमेरिका आणि रशियामधून निर्यात करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर्सचा समावेश असल्याने यामुळे नोंदणी आणि देखभालीत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
आणखी एका चिनी तज्ज्ञाच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने भारतीय लष्करात बेशिस्तपणा असून अनेकदा भारतीय सैन्य प्रक्रिया तसेच नियमांचे पालन करत नाही असे सांगण्यात आले आहे. चीनने यावेळी २०१९ मध्ये भारतीय विमानाला लागलेली आग आणि २०१३ मध्ये भारतीय पाणबुडीत झालेला स्फोट यांचा उल्लेख करत या सर्व मानवी चुका असल्याचा दावा केला आहे.
नुकतीच झालेली ही दुर्घटना टाळता आली असती. उदाहरणार्थ, जोपर्यंत हवामानात सुधारणा होत नाही तोपर्यंत उड्डाण थांबवलं असतं, पायलटने अधिक काळजीपूर्वक किंवा कुशलतेने उड्डाण केलं असतं किंवा हेलिकॉप्टरची कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेतली असती असं सांगत चीनने पुन्हा एकदा भारतीय लष्करातील त्रुटी असा उल्लेख केला.
यावेळी एका तज्ज्ञाने, ही समस्या संपूर्ण भारतीय लष्करात आहे. चीन-सीमेवर तैनात भारतीय सैन्यही नेहमी चिथावणी देण्याचे काम करत असते असे सांगताना खरं युद्ध झालं तर चिनी लष्करासमोर भारताला काहीच संधी नाही असे म्हटले आहे.
दरम्यान बिपिन रावत यांच्या निधनाने भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे. बिपिन रावत यांच्या निधनामुळे बेशिस्त लष्करील सरकारचे नियंत्रण सुटू शकतं आणि सीमेवरील स्थिती हाताबाहे जाऊ शकते असे चीनचे म्हणणे आहे. चीन नाही तर मागासलेपण भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे असेही या लेखात सांगण्यात आले आहे.