अहमदाबाद – अरबी समुद्रामध्ये कच्छच्या आखातामध्ये आज दोन व्यापारी जहाजांची टक्कर झाली. यातील एक जहाज भारताचे होते आणि तर दुसरे जहाज फिलीपाईन्सचे होते. या जहाजांवर एकंदर 44 कर्मचारी होते.
या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा जहाजांमधील तेलगळतीही झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कच्छचे आखात सागरी जैवविविधतेसाठी संपन्न आहे. त्यामुळे या ठिकाणी तेलगळती झाल्यास सागरी जैवसंपदेला हानी पोहोचू शकते.
हे ध्यानात घेऊन ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी तेलगळती झाली असल्याच्या शक्यतेने तटरक्षक दलाच्यावतीने कसून तपासणी केली जाते आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमव्ही अटलांटिक ग्रेस आणि एमव्ही एव्हिएटर या दोन्ही जहाजांमध्ये काल रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही टक्कर झाली. तट रक्षक दलाची जहाजे आणि हेलिकॉप्टरकडून या ठिकाणची तपासणी केली गेली. तटरक्षक दलाचे प्रदुषण नियंत्रण जहाज आयसीजीएस समुद्र पावक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते.