पिंपरी -महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आगारातून गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेस सोडण्यात आलेल्या नाही. गतवर्षी करोनामुळे तर, यंदा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही बससेवा बंद आहे. पर्यायाने, एसटीला लाखो रुपयांचे उत्पन्न गमवावे लागले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गर्दी होत असते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातूनही भाविक आणि भक्त जात असतात. हीच बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगारातून दरवर्षी 15 जादा गाड्या त्यासाठी सोडण्यात येतात. त्याशिवाय, नियमित 5 बसेस येथे जात असतात. कार्तिकी एकादशीच्या आधी दोन दिवस, कार्तिकी एकादशीला आणि एकादशीनंतर सलग दोन दिवस अशा पाच दिवसांच्या कालावधीत या बस सोडल्या जातात.
संप सुरू असल्याने वल्लभनगर आगाराचे दररोज सरासरी साडेसहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. येथून राज्यभरात दररोज 45 ते 49 बस सोडण्यात येतात. ही बससेवा सध्या पूर्णत: ठप्प आहे. वल्लभनगर आगारातून एकही बस गेल्या आठ दिवसांत सोडण्यात आलेली नाही.
कार्तिकी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपूर यात्रेसाठी वल्लभनगर आगारातून बस सोडण्यात येतात. गतवर्षी करोनामुळे तर, यंदा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यासाठी बस सोडलेल्या नाही. पाच दिवसांच्या कालावधीत मिळणारे उत्पन्न बुडाले आहे.
– हनुमंत गोसावी, वल्लभनगर आगार व्यवस्थापक.