नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे खासदार वरूण गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला देशाच्या कृषी धोरणांचा आणि नवीन कृषी कायद्यांचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही मागणी करताना लखीमपुर मधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
त्यात या शेतकऱ्याने म्हटले आहे की आपला कृषी माल गेले पंधरा दिवस विकला न गेल्याने आपण आपले पिक शेतातच जाळून टाकले आहे. त्यांनी आपले तांदळाचे उत्पादन अनेक मंडयांमध्ये विकायला नेले पण त्यांचा तो माल विकला न गेल्याने त्यांनी हा तांदुळ चक्क जाळून टाकला. समोधसिंग असे या शेतकऱ्याचे नाव असून तो या व्हिडीओ मध्ये आपल्या कृषी मालावर केरोसिन टाकून ते पेटवून देताना दिसत आहेत.
सध्याच्या कृषी व्यवस्थेने देशातील शेतकऱ्यांना कोणत्या स्थितीत आणून ठेवले आहे असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे देशाच्या कृषी धोरणाचा सरकारने फेरविचार केला पाहिजे असे वरूण गांधी यांनी म्हटले आहे.
गेल्या गुरूवारी त्यांनी पिलभीत आणि अन्य भागातील पूरस्थितीचे व्हिडीओ ट्विटरवर टाकून उत्तरप्रदेशातील योगी अदित्यनाथ यांच्या सरकारवर जाहींर टीका केली होती. वरूण गांधी यांना अलिकडेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतूनही वगळण्यात आल्यापासून त्यांनी पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.