पुणे – परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मार्केट यार्डात कोथिंबिरीची आवक कमी होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कोथिंबिरीचे भाव कडाडले आहेत. शहरातील विविध भागात किरकोळ बाजारात 50 ते 80 रुपये भावाने कोथिंबिरीच्या जुडीची विक्री होत आहे. वर्षभरात कोथिंबिराला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशावर भार पडत आहे.
मूळात परतीच्या भावाचा फटका सर्वच पालेभाज्यांना बसला आहे. जवळपास सर्वच पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. तसा कोथिंबिरीला बसला आहे. सर्व पालेभाज्यांच्या तुलनेत कोथिंबिरीची मागणी नागरिकांकडून अधिक होत आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव कडाडले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला 10 ते 15 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.
पुणे विभागातून कोथिंबिरीची आवक होत असते. परतीच्या पावसाने आता दडी मारली आहे. त्यामुळे विभाग आणि इतर विभागातून मार्केट यार्डात कोथिंबिरीची आवक होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत म्हणजे सुमारे 10 ते 12 दिवस अशी परिस्थिती कायम राहणार आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीचे भाव चढेच राहणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.