नवी दिल्ली – ऍल्युमिनियम क्षेत्राला मिळणाऱ्या कोळशाचा पुरवठा बराच कमी झाला आहे. त्यामुळे या उद्योगासमोर भयंकर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने ऍल्युमिनियम क्षेत्राचा पुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करावा अशी मागणी या क्षेत्राने केली आहे.
ऍल्युमिनियम उत्पादकांच्या संघटनेने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की देशात ऍल्युमिनियमचा साठा अगोदरच कमी आहे. त्याचबरोबर ऍल्युमिनियमची आयात महाग पडते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्याची गरज आहे.
मात्र ऍल्युमिनियम क्षेत्राला कोळशाची मोठ्या प्रमाणात गरज असते. ऍल्युमिनियमच्या एकूण उत्पादन किमतीत कोळशाचा वाटा 40 टक्के असतो. मात्र गेल्या काही दिवसापासून आवश्यक इतका कोळसा पुरवठा होत नसल्यामुळे या क्षेत्रासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यातच कामगारांना पगार द्यावा लागतो शिवाय ऍल्युमिनियम वापरणाऱ्या कंपन्यांना याचा आगामी काळात बराच त्रास होणार आहे. यासाठी या क्षेत्राचा कोळसा पुरवठा शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची गरज ऍल्युमिनियम उत्पादकाच्या संघटनेने कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद आगरवल यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
ऍल्युमिनियमचे कारखाने निरंतर चालू ठेवावे लागतात. मात्र या क्षेत्राला कोळसा पुरवठा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील यंत्रसामग्रीवर नकारात्मक परिणाम होत असतो. ऍल्युमिनियमसारख्या मूलभूत क्षेत्रावर परिणाम झाला तर त्याचा इतर उद्योगावर, त्यातल्या त्यात लघुउद्योगावर जास्त परिणाम होत असतो.
त्यामुळे औद्योगिक उत्पादनाबरोबरच कामगारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. जागतिक बाजारात ऍल्युमिनियमचा पुरवठा कमी झाला आहे. त्याचबरोबर ऍल्युमिनियमच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे आयात करून ही गरज भागविणे अवघड जाणार आहे