नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांची कॉंग्रेसने निवड केली होती. मात्र काही दिवसातच सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सिद्धू यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. मात्र 18 दिवसांनी सिद्धू यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.
नाराज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि यानंतर राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्का दिला. राहुल गांधी भेटीनंतर बोलताना त्यांनी आपल्याला वाटत असलेली काळजी, विचार आपण त्यांच्यासमोर मांडले असून आता सर्व काही ठीक झालं असल्याचं सांगितलं. पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी ही माहिती दिली.
दसऱ्याच्या मुहुर्तावर राहुल गांधी यांची भेट घेत सिद्धू यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. २८ ऑक्टोबरला राजीनामा दिल्यानंतर सिद्धू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्रीय नेतृत्वही गोंधळात पडलं होतं. कारण सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय नेतृत्वाकडून घेण्यात आला होता. यावरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी नाराज होते.
यासंदर्भात पंजाबचे प्रभारी हरीश रावत माहिती देताना म्हणाले की, त्यांनी आपले मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल असे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असे आश्वासन दिले.
नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, मी हायकमांडला माझ्या मनात असणाऱी काळजी सांगितली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे.