मुंबई – न्यूझीलंडचा संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारताचा दौरा करत आहे. या मालिकेत त्यांचा संघ 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसह दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. यातील दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून त्यासाठी प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे संकेत बीसीसीआय व मुंबई क्रिकेट संघटनेने दिले आहेत.
करोनाच्या धोक्यामुळे आयपीएल तसेच टी-20 विश्वकरंडकाचे आयोजन अमिराती व ओमानमध्ये केले जात आहे. बीसीसीआयकडे या स्पर्धेचे यजमानपद असूनही ही स्पर्धा भारताबाहेर होत आहे. मात्र, त्यानंतर न्यूझीलंड संघ भारताचा दौरा करणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येत्या 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवरील आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडने आतापर्यंत भारतात कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारतामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान एकूण 11 मालिका खेळल्या गेल्या असून 2016-17 साली खेळल्या गेलेल्या अखेरच्या मालिकेत भारतीय संघाने 3-0 असा विजय मिळवला होता. या दोन संघात आजवर 34 कसोटी खेळल्या गेल्या असून भारताने तब्बल 16 तर, न्यूझीलंडने केवळ 2 विजय मिळवले आहेत. 16 सामने अनिर्णित राहिले आहेत.