नाशिक – शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. विभा गुरव (रा. शिरवाडे वणी) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वादळी पाऊस होत असून वीजेचे तांडव सुरू आहे. आज शनिवारी दुपारीही शिरवाडे वणी परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात चंद्राची मेट येथील रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत असताना अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. सुदैवाने या घटने जीवीतहाणी झाली नाही. मात्र एका मुलीची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. त्यात दहा शेळ्या जागीच ठार झाल्या.
दरम्यान, कुलाबा वेधशाळेनुसार 9 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.