नवी दिल्ली – भाजपने सत्तेत असलेल्या राज्यातील 4 मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता अजून एका राज्यातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. आणि हा बदल अवघ्या 8 ते 10 दिवसांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातनंतर आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा पत्ता कट होऊ शकतो.
दिल्ली सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन, त्यात हरयाणाच्या शेतकऱ्यांच्या असलेला सहभाग आणि त्यात लाखीमपूर शेतकरी मृत्यूनंतर मनोहरलाल खट्टर यांनी केलेलं वादग्रस्त विधान यामुळे राजकीय वर्तुळातून खट्टर यांच्यावर टीका होत आहे. त्यातच हरयाणाच्या शेतकऱ्यांमध्येही खट्टर यांच्याविरोधात रोष आहे. त्यामुळेच भाजप हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
मनोहरलाल खट्टर यांच्याविषयी बोलताना भाजपचे नेते विरेंद्र गुज्जर म्हणाले की, खट्टर यांना आठवडाभरात, दहा दिवसांत हटवलं जाईल. कोणी कोणावर उपचार करत नाही. देशात लोकशाही आहे. तिनंच सगळ्यांचे उपचार होतात. गुज्जर यांना भाजपने काही दिवसांपूर्वी विधान परिषदेवर आमदार केलं आहे. त्यामुळे गुज्जर यांच्या बोलण्याला वजनही असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत.
आपल्या विभागातील 500, 700, 1000 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा. त्यांना स्वयंसेवक बनवा. आणि काठ्या हातात घेऊन जशास तसे उत्तर द्या. तुम्ही चिंता करू नका. फार काय तुम्ही एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने तुरुंगात जाल. पण मोठे नेते व्हाल. तुमचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल, असे वादग्रस्त विधान खट्टर यांनी केले होते.
त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करत असलेला भाजप अजुनच अडचणीत आला आहे. त्यामुळे खट्टर यांची उचलबांगडी केली जाणे जवळपास निश्चित झाले असल्याचे मानले जाते आहे. त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची सध्या चाचपणी सुरू आहे.