मुंबई – शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असतानाच देशात आणि परदेशात काही नकारात्मक घटना घडल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात बरीच नफेखोरी होऊन निर्देशांक अस्थिर राहिले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 410 अंकांनी कोसळून 59,667 अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी हा निर्देशांक 1,032 अंकांनी कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 106 अंकांनी म्हणजे 0.6 टक्क्यांनी कोसळून 17,748 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेतील कर्जरोख्यावरील परतावा वाढला आहे. चीनमधील एव्हरग्रॅंडे कंपनीच्या पेच प्रसंगानंतर तिथे वीज टंचाई निर्माण झाल्यामुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातून क्रूडची मागणी वाढल्यामुळे क्रूडचे दर आज 80 डॉलर प्रति पिंपापर्यंत वाढले. डॉलर वधारत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर बराच परिणाम झाला आहे. या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी नफेखोरी झाल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान, वित्त, दूरसंचार क्षेत्राबरोबरच रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी नफ्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री केली. मात्र अशा परिस्थितीतही ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये थोडीफार वाढ झाली. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.71 टक्क्यापर्यंत वाढले. जागतिक बाजारातील वातावरण अस्थिर असल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी कमी झाले. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही विक्रीचे वारे आले.
भारती एअरटेल, महिंद्रा, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, एचसीएल टेक, इन्फोसिस या कंपन्यानी सपाटून मार खाल्ला. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बॅंक, पावर ग्रिड, सन फार्मा, टायटन या कंपन्यांनी निर्देशांकांना आधार दिला.