पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून 24 तास पाणीपुरवठा योजनचे स्वप्न शहरवासियांना दाखविण्यात आले. प्रत्यक्षात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत शहरवासियांना दरोरज पाणी मिळणार असल्याचा दावा आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे. शहरामध्ये पाणी योजनेच्या रखडलेल्या कामांचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरवासियांना टप्याटप्याने 24 तास पाणी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. निगडी प्राधिकरण परिसरात 24 तास म्हणजेच दिवसभर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
शहराची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून दररोज पाणीपुरवठा कधी होणार. तसेच 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काय झाले ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत बोलताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 40 टक्के व 60 टक्के भागासाठी कामे करण्यात येत आहेत. नव्या जलवाहिन्या टाकण्याचे व नळजोडीचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे यापुढे टप्प्या टप्प्याने शहरभर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून 24 तास म्हणजेच दिवसभर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सुरूवातीच्या महिन्यात पाण्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. परंतु, तो आता कमी झालेला आहे. 24 तास पाणीपुरवठा करताना शहरातील ठराविक पाच भागांमध्ये दररोज पाणी दिले जाणार आहे. त्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. त्यास आगामी महिन्याभरात सुरूवात करण्यात येणार असल्याचेही आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेतील पाण्याची उपलब्धता आणि पाणीपुरवठा विभागाचा कारभार पाहता 24 तास पाणीपुरवठा कधीपासून सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशी आहे 24 तास पाणी पुरवठा योजना
शहरात 24 तास 7 दिवस संपूर्ण शहराला पाणी देण्याची महत्त्वकांक्षी योजना महापालिकेने 2015 मध्ये राबविण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेतून 40 टक्के भागासाठी 207 कोटी रुपये खर्चून पहिला टप्पा राबविण्यात आला. भाजपच्या कार्यकाळात अमृत योजनेतून उर्वरित 60 टक्के भागासाठी दुसरा टप्पा राबविण्यात आला. त्याअंतर्गंत 300 कोटींहून अधिक खर्चाची कामे सुरू आहेत. या कामांवर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. योजनेतून संपूर्ण शहरातील पाणी गळती रोखणे व वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचा मुख्य हेतू होता.