मुंबई – राष्ट्रीय निवड समितीने अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने मर्यादीत षटकांच्या सामन्यांच्या संघात तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. बीसीसीआयने सगळ्यांनाच सर्वात आश्चर्याचा धक्का देत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या मेंटॉरपदी नियुक्त केले असून तो मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह काम करणार आहे.
यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन व वरुण चक्रवर्ती यांना आयपीएल तसेच भारतीय संघाकडून संधी मिळालेल्या सामन्यांत सरस कामगिरी केल्यामुळे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. संघात तब्बल पाच फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अश्विनला सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील एकाही कसोटीत स्थान देण्यात आलेले नसताना टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी मात्र, स्थान देण्यात आले आहे.
तसेच श्रीलंकेत राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या व मालिका जिंकलेल्या संघाचा कर्णधार शिखर धवन व सातत्याने धावा केलेल्या पॉथ्वी शॉ यांच्या नावाचा साधा विचारही संघ निवडीदरम्यान झाला नसल्याचे निवड समितीचे प्रमुख व माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांनी सांगितले. ही स्पर्धा येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत अमिराती व ओमानमध्ये होणार आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि महंमद शमी.
राखीव – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व दीपक चहर.