लंडन – इंग्लंडविरुद्धच्या मॅंचेस्टर येथे होत असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात किमान तीन बदल होण्याची शक्यता आहे. सातत्याने अपयशी ठरलेला अजिंक्य रहाणे, फलंदाजीत चमक दाखवण्यात अपयशी ठरलेला रवींद्र जडेजा व सातत्याने सामने खेळल्यामुळे थकलेल्या जसप्रीत बुमराह यांच्या जागी अन्य तीन खेळाडूंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाने इंग्लंडचा ओव्हल कसोटीत 157 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटीत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवी आणि अंतिम कसोटी येत्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. ओल्ड ट्रेफर्ड मैदानवर होणारी ही लढत भारताने जिंकली किंवा अनिर्णित राहिली तरी भारतीय संघच मालिका जिंकणार आहे. त्यामुळे हा सामना मालिका विजयासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने संघातील अपयशी तसेच दमणूक झालेल्या खेळाडूंच्या जागी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपकर्णधार रहाणे याला या संपूर्ण मालिकेत फारशी सरस कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या चार कसोटी सामन्यात तो अपयशी ठरला आहे. जर त्याला वगळण्याचा निर्णय घेतला गेला तर हनुमा विहारीला संधी मिळू शकते. जडेजाच्या जागी रवीचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते. या मालिकेत जडेजाने फलंदाजीत थोडीफार चमक दाखवली असली तरीही फलंदाजीचा निकष लावला तर अश्विन जास्त परिपक्व असल्याने त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खेळत आहे. तसेच दुखापतीमुळे महंमद शमीला चौथी कसोटी खेळता आली नव्हती. जर बुमराहला विश्रांती देण्याचा विचार झाला तर त्याच्या जागी शमीला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
अश्विनला खेळवणार की केवळ सरावच करवणार
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी मॅंचेस्टरला दाखल झाला असून खेळाडूंनी सराव सत्रात धावण्याचा सराव केला. यावेळी कर्णधार विराट कोहलीसह रवीचंद्रन अश्विननेही सराव केला. मात्र, अश्विनला खेळवणार की केवळ त्याच्याकडून सरावच करून घेणार, याचे उत्तर अंतिम संघ जाहीर झाल्यावर मिळणार आहे. या सराव सत्रात अजिंक्य रहाणेनेही उपस्थिती लावल्याने त्याचा समावेश होणार की त्याला डच्चू दिला जाणार याचीही चर्चा सध्या रंगली आहे.