हेडिंग्ले – तीन कसोटी सामने पार पडले आहेत. त्यात हेडिंग्ले कसोटीत ज्या पद्धतीने भारतीय संघाने फलंदाजी केली त्यावर बोलण्यात आता काही अर्थ नाही, पण जर संघात चार गोलंदाज खेळवले जाणार असतील तर सात फलंदाजही खेळवायला हवे, असा सल्ला विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला दिला आहे.
संघ निवड काय करायची तसेच कोणाला संधी द्यायची हा विचार संघ व्यवस्थापनाने करायचा आहे. मात्र, पहिल्या तीनही सामन्यांत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने निराशा केली आहे. आता त्याच्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्याने फलंदाजीतही चमक दाखवली नाही तसेच त्याची यष्टीमागील कामगिरीही समाधानकारक केलेली नाही. त्याच्या जागी बदली खेळाडूला संधी देण्यात यावी तसेच फलंदाजी जास्त सशक्त केली पाहिजे, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
भारतीय संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत, पण जितकी संधी पंतला दिली गेली तितकी संधी प्रत्येकाला मिळत नाही. त्यामुळे तीन कसोटी पंतने खेळल्या आता त्याला आणखी संधी देण्यात येऊ नये, त्यापेक्षा हनुमा विहारीसारख्या खेळाडूला संधी दिली गेली तर कदाचित संघाच्या कामगिरीतही सुधारणा होईल. संघात ज्यांना सातत्याने संधी मिळाली आहे, पण त्यांना अपयश आले आता नवा विचार करण्याची गरज आहे, असेही गावसकर यांनी सांगितले आहे.
नवोदितांना संधी द्या
या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटी सामने पार पडले आहेत. मालिका 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे ही मालिका जिंकायची असेल तर भारतीय संघाला केवळ नाममात्र बदल करून उपयोग होणार नाही तर, प्रत्येक गोष्टीचा विचार करत संघ निवड केली पाहिजे. ज्यांना फलंदाजीत तसेच गोलंदाजीत अपयश आले आहे त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार केला जावा. संघात नवोदित खेळाडू असून त्यांच्यात अफाट गुणवत्ता आहे मग त्यांना केवळ बाहेर बसवून ठेवण्यात अर्थ नाही. अशा खेळाडूंना सातत्याने संधी दिली गेली पाहिजे, असा सल्लाही गावसकर यांनी दिला आहे.