चेन्नई -बंगालच्या उपसागरात मंगळवारी दुपारी 5.1 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचा हादरा तामीळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांमध्ये जाणवला. सुदैवाने, भूकंपामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
बंगालच्या उपसागरात 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ते ठिकाण आंध्रच्या काकीनाडापासून 296 किमी, तर तामीळनाडूच्या चेन्नईपासून 320 किमी अंतरावर आहे. काकीनाडा आणि लगतच्या परिसरातील नागरिकांनी छतांचे पंखे हलल्याचे सांगितले.
काहींच्या घरांमध्ये फडताळांवर ठेवण्यात आलेल्या वस्तू खाली पडल्या. चेन्नई आणि परिसरातील नागरिकांनी फर्निचर हलत असल्याचे पाहिले. त्यामुळे काही क्षणांतच भूकंपाचा हादरा हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. अर्थात, कुठलीच हानी न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.