समीर भुजबळ
वाल्हे -पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस जोड (कनेक्शन) देण्यात येत आहे. वाल्हे (ता.पुरंदर) येथील यशोधन गॅस एजन्सी मधून सद्य:स्थितीत दुसऱ्या टप्प्यातीमध्ये एकही लाभार्थी नवीन जोडसाठी पात्र ठरला नसल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सिलिंडरचे दर न परवडणारे असल्याने सरपणावरील चुलच बरी म्हणण्याची वेळ गृहिणीवर आली आहे. त्यामुळे पंतप्रधानांची “उज्ज्वला’ डोळ्यात आसू आणणारीच असल्याचे ग्रामाण भागातील महिला थेट सांगत आहेत.
दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांना, स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीच्या धुरामुळे, होणारे प्रदूषण कमी व्हावे या हेतुने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गंत गॅसचे वितरण मागील वर्षी पहिल्या टप्प्यात केले; मात्र गत काही महिन्यात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसीडीही बंदच झाल्याने,
उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थींनी सिलिंडर खरेदी बंद केली आहे. त्यातच चूल पेटविण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने विस्तव पेटविण्यासाठी महिलांच्या डोळ्यांतून आसू येत आहेत. ग्रामीण भागातील 90 टक्के कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत होते. 2020 मध्ये 714. 50 रुपयांवर असलेले गॅस सिलिंडर, ऑगस्ट 2021 मध्ये 867.50 रुपयांवर जाऊन पोहोचेला आहे.
सध्या 867.50 रुपये दर
उज्ज्वला योजनेंतर्गंत गॅस जोड मोफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याने खुल्या बाजारातील दराप्रमाणे सिलिंडर घेणे परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2020 मध्ये 714.50 रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै 2020 पर्यंत कमी होत जाऊन 599.50 रुपयांवर आले होते.
जानेवारी 2021 मध्ये हे दर 699.50 रुपयांवर पोहोचले, त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी 2021 मध्ये सिलिंडरचे दर 789. 50, तर मार्च मध्येही 827 रुपयांवर पोहोचला. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत सिलिंडरचे भाव 10 रूपयांनी कमी होऊन 817 रूपये झाले होते. यानंतर जुलै 2021 मध्ये 842.50 तर 16 ऑगस्ट 2021 नंतर 867.50 पर्यंत सिलिंडरचे दर पोहोचेल आहेत.
निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थीचा “रामराम’
केंद्र सरकारच्या उज्वला योजनेंतर्गंत मागील दोन-तीन वर्षामध्ये वाल्हे येथील यशोधन गॅस एजन्सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2539 लाभार्थ्यांना गॅस जोड मोफत देण्यात आले आहेत. यामधील मार्च 2021 मध्ये फक्त 1569 लाभार्थ्यींनी सिलिंडर भरून नेला होता. तर 970 उज्ज्वल योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी सिलिंडर महाग
आणि इतर काही कारणाणे सिलिंडर भरून नेला नव्हता. जुलै 2021 अखेपर्यंत 2539 लाभार्थी असून यातील फक्त 1232 जणांनी सिलिंडर भरून नेला असून, या योजनेला निम्म्याहून जास्त 1307 लाभार्थी सिलिंडर भरून नेत नाहीत. तसेच दिवसेंदिवस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम झाला आहे, अशी माहिती व्यवस्थापक अश्विनी वाघोले यांनी सांगितले.
उज्ज्वला योजनेंतर्गंत आम्हाला यशोधन गॅस एजन्सी वाल्हे येथून, मागील दोन-अडीच वर्षांपूर्वी गॅस जोड मोफत मिळाले; मात्र महागडा सिलिंडर घेणे परवडत नाही. आम्ही दिवसभर उन्हा-तान्हात राबल्यावर 150 रूपये मिळत्यात आणि त्या सिलिंडरच्या मढ्यावर कुठे 900 रूपये खर्च करायचा. आम्ही मग खायचे काय ? त्यामुळे बिन खर्चिक चुलीच बरी.
– अंजना नेटके, कष्टकरी गृहीणी, वाल्हे
करोनाच्या आधी तेलाचा पुडा 75 रूपयाला मिळायचा, आता 160 रूपायाला. गॅस सिलिंडर मिळत होता 500 रुपयाला आता 900 च्यावर गेला. पंतप्रधान मोदींनी मोफत गॅसजोड दिले; मात्र आता सिलिंडर महाग करून ठेवल्याने घरातील खर्च भागवतांना नाकीनऊ येते आहे, त्यामुळे आम्ही आता सिलिंडर भरून आणला नाही. आता चुलीवर स्वयंपाक करतोय.
– मनीषा खोमणे, गृहिणी, वाल्हे