मुंबई : राज्यात करोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचे सावट कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच राज्यातील दुकानांची वेळ ही वाढवण्यात अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत असताना त्याविषयीची मोठे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले आहे. तसेच, यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे.
कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. असं देखील सांगितलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.