नवी दिल्ली – गेल्या दीड वर्षाच्या करोना प्रादुर्भावाच्या काळात ऑक्सिजन अभावी रुग्ण मरण पावल्याची नोंदच नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण वाचल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. अनेक रुग्णालयांबाहेर प्राणवायूविना मरण पावलेले रुग्ण आणि काही ठिकाणी ऑक्सिजन सिलींडरमुळे झालेले अपघात अशा गोष्टींचा विचार करता, हा संताप बरोबर आहे, असे वाटू शकते. मात्र, ऑक्सिजन अभावी मृत्यु पावल्याची सरकारदरबारी नोंद नसण्याला अनेक पैलू आहेत, ते जाणून घेणे गरजेचे आहे.
आरोग्य सेवेच्या निकषांनुसार, एखाद्या रुग्णाचा मृत्यु नक्की कशामुले झाला, याची नोंद राज्य सरकारने ठेवायची असते आणि वैद्यकीय कारणांचे वर्गीकरण करुन अशा विविध कारणांनी निधन झालेल्या व्यक्तींबाबतच अहवाल केंद्र सरकारकडे पाठवायचा असतो. कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाच्या कसोटीच्या काळात एकाही राज्याने असा अहवाल तयारच केला नाही त्यामुळे केंद्राकडेही तशी (रुग्णाच्या मृत्युच्या कारणाची) नोंद आढळून आली नसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून ना राज्यांनी काही रेकॉर्ड ठेवले ना केंद्राने काही माहिती मागवली.
कोणतेही राज्य आपल्या बेपर्वाईची अशी जाहिरात करणार नाही. त्यापेक्षा केंद्रावर सगळे काही ढकलून आपली सुटका करुन घेता येते, हे काही चाणाक्ष राजकीय नेत्यांनी ओळखले असल्याने, “ऑक्सिजन अभावी मृत्यु नोंदींच्या बाबत केंद्र आणि राज्य सरकारांचे केवळ “तू-तू-मैं-मैं’ सुरु असल्याचे दिसून येत आहे.
कोव्हिड-19 च्या गंभीर कालावधीत अनेक रुग्णालयांत बेड्स उपलब्ध नव्हते, जम्बो कोव्हिड सेंटरमध्येही मोठी प्रतिक्षा यादी असायची. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचे निदान करुन त्याच्या निधनाचे कारण नमूद करता येते. पण ज्या रुग्णांना बेडच मिळाला नाही, त्यांचे निधन रुग्णालयाबाहेर अथवा गृह विलगीकरणात झाले असेल, तर अशा रुग्णांचे निधनाचे कारण अथवा आजाराचे निदान कागदोपत्री नोंद करता आलेले नाही.
ऑक्सिजन अभावी मृत्यु झाल्याचे सिद्ध करणे वैद्यकीयदृष्टया कठिण असते, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. दिल्लीतील डॉ. दिलीप लहरिया सांगतात की, एखाद्याच्या मृत्यु प्रमाणपत्रावर “ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निधन’ असे वैद्यकीय कारण देता येत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील अवयव काम करेनासे होतात. अशावेळी “मल्टीपल ऑर्गन फेल्युअर’ हे कारण देता येते. त्यामुळे ‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुले निधन’ असे नमूद करता येत नाही.
बहुतांश रुग्णालयांकडे ऑक्सिजन सिलींडर वापराबाबतचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध असते. एखाद्या रुग्णालयात प्राणवातू अभावी एखाद्या रुग्णालयाचे निधन झाले असेल, तर त्यावेळी त्या रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध होता की नाही, याचा तपशील तपासावा लागेल. शिवाय, ऑक्सिजन अभावी मृत्यु पावलेल्यांचे स्वतंत्र तपशील नोंद करण्यासाठी कोणत्याही राज्याच्या आरोग्य विभागाने आदेश दिले नव्हते. त्यामुळे अशा नोंदी झाल्या नाहीत.
आता पर्याय एकच…
कोणत्या रुग्णाचा मृत्यु ऑक्सिजन अभावी झाला, याची माहिती मिळवायची असेल, तर आता प्रत्येक राज्य सरकारला, गेल्या दीड वर्षांत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना भेटून, ते सांगतील त्या माहितीवर विश्वा ठेवत माहिती गोळा करावी लागणार आहे. याशिवाय, घरोघरी वैद्यकीय पथक पाठवूनही अशी अधिकृत माहिती गोळा करता येऊ शकते. तरच या वादग्रस्त विषयावर पडदा पडू शकेल, हेच वास्तव आहे.