कोलकता – पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्या ठरावाला भाजपने विरोध केला. आता विधान परिषदेच्या स्थापनेवरून त्या राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांनी विधान परिषद स्थापनेविषयीचा ठराव मांडला. त्यावर मतदान घेण्यात आले. विधानसभेत उपस्थित 265 पैकी 196 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर, 69 सदस्यांनी विरोधात मतदान केले. विधान परिषदेच्या स्थापनेला विरोध दर्शवणारी भूमिका भाजपने मांडली.
बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला मागील दाराने राजकारण करायचे आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार बनवण्याचा तृणमूलचा प्रयत्न आहे. मात्र, विधान परिषदेच्या स्थापनेमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, असे भाजपने म्हटले.
बंगालमधील प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बनलेल्या तृणमूल आणि भाजपमध्ये सातत्याने विविध मुद्द्य्ांवरून राजकीय संघर्ष सुरू असतो. आता विधान परिषद स्थापनेवरून तो संघर्ष वाढण्याला हातभार लावणारा आणखी एक मुद्दा पुढे आला आहे.