नवी दिल्ली – जीवघेण्या करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा देशातील प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. असे असले तरी आता देशात लवकरच करोनाची तिसरी लाटही येणार असल्याची चिंताजनक बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आपल्या अहवालामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, भारतात पुढील महिन्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते.
त्याचबरोबर, या अहवालामध्ये ही लाट सप्टेंबर महिन्यापर्यंत शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या रिसर्च अहवालामध्ये म्हटले आहे की, 7 मे रोजी भारतातील करोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 10,000 करोनाची प्रकरणे पोहचू शकतात. पण, ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत करोनाची प्रकरणे वाढू शकतात, असे समूहाचे मुख्य आर्थिक सल्लगार सौम्य कांती घोष यांनी अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, जागतिक आकडेवारीवरून समजते की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत जास्त लोकांना करोनाची लागण होईल. या लाटेचा परिणाम जवळपास 98 दिवस राहू शकतो. या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, तिसरी लाट दुसऱ्या लाटे एवढीच गंभीर असू शकते.
पण, सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या करोना लसीकरण मोहिमेचाही लोकांना फायदा होईल. या लाटेत मृतांचा आकडा दुसऱ्या लाटपेक्षा कमी असू शकतो. याचबरोबर, विकसित देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा कालावधी 108 दिवस आणि तिसऱ्या लाटेचा कालावधी 98 दिवसांचा आहे. यादरम्यान, करोनावर मात करण्यासाठी, जर चांगली तयारी केली गेली, तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.