रामकुमार आगरवाल
देहूगाव – “”संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा।।” या संत तुकाराम महाराजांच्या अभंग उक्तीप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांडनायक पंढरीशी परमात्मा पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रस्थान ठेवले आहे.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी प्रस्थान ठेवले. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या नामघोषात मंदिर परिसरात प्रदक्षिणा करण्यात आली.
टाळ, मृदुंग, वीणा आणि नाम गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात पादुकांना प्रदक्षिणा करून भजनी मंडपात विसावली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देहूगावमध्ये पालखी प्रस्थान असल्याने मुख्य मंदिर, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता.
परंपरेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे चार वाजता काकडा, पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिराची महापूजा, पहाटे पाच वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, पहाटे साडेपाच वाजता वैकुंठगमन मंदिर व सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका सकाळी नऊच्या सुमारास सेवेकरी मसलेकर यांनी मुख्य मंदिरात आणल्या.
काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन उपस्थित वारकऱ्यांसह टाळ-मृदंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात मंदिराला प्रदक्षिणा करून भजनी मंडपात आणल्या. मुखी हरिनामासह ज्ञानोबा-तुकाराम हा जयघोष करीत या पालखी प्रस्थान सोहळ्याला दुपारी सव्वादोन वाजता प्रारंभ झाला.
या सोहळ्याची विधीवत महापूजा ग्रामोपध्याय सुभाष टंकसाळ यांनी पृथ्वी, वायू, अग्नी, जल, आकाश यांसह पाद्यपूजा व कलशपूजा केली. प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची विधीवत महापूजा छत्रपती संभाजी महाराज, महाराणी संयोगिताराजे यांच्या हस्ते करण्यात आली.
पादुकांची विधिवत पूजा व आरती झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते पादुका फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. भाविकांनीही पालखीला खांद्यावर घेत भजनी मंडपातून बाहेर आणली. तुतारी (शिंगाडा) धारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली. यावेळी चौघडा, टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाच्या जय घोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये अधिकच उत्साह भरला, त्यांच्या मुखातून अभंगाचे बोल बाहेर पडू लागले.
वारकऱ्यांचे हातातील टाळ, विणा-मृदंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात एक एक पाऊल पुढे पडत होते. मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून पालखी बाहेर पडली. चोपदार नामदेव गिराम यांच्यासह उपस्थित सेवकऱ्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या घेत पालखी देऊळवाड्यातील मुख्य मंदिर, राममंदिरासह शिळा मंदिराला प्रदक्षिणा करीत पावणे पाचच्या सुमारास भजनी मंडपात विसावली. प्रथेप्रमाणे रात्री देहूकर दिंडीचे कीर्तन आणि जागर झाला.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज उपस्थित होते. यावेळी दैनिक “प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी पालखी सोहळ्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले, हा निर्णय वारकऱ्यांच्या हितासाठीच आहे. कोणालाही या आजाराची बाधा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मी कोणत्याही रस्त्यावरील आंदोलनाच्या विरोधात आहे. आम्ही सुद्धा जे आंदोलन केले ते मूक आंदोलन होते. वारकऱ्यांना कोविड होऊ नये, यासाठीच हे निर्बंध लावण्यात आले आहेत. ठोक मोर्चा आंदोलन होणे चुकीचे आहे, गर्दी होणे चुकीचे आहे. वारकरी हे शंभर दोनशे येत नाहीत. चोपदाराने दंड वर केल्यास वीस लाख वारकरी थांबतात, एवढी ताकद वारकऱ्यांमध्ये आहे. वारकरी समजूतदार आहेत. जसे मागच्यावर्षी थांबले, यंदाही थांबतील.