साउदम्पटन – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भारत व न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पावसाने सातत्याने व्यत्यय आणल्यामुळे अनिर्णित राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आयसीसीला टेनिस व फुटबॉलच्या धर्तीवर निकाल लावण्याचा अनोखा सल्ला दिला आहे.
टेनिसमध्ये जशी सेटमध्ये बरोबरी झाली की टायब्रेकर सेट खेळवला जातो किंवा फुटबॉलमध्ये ज्या पद्धतीने पेनल्टी शूटआऊट खेळवला जातो तीच पद्धती कसोटी क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल हाती येण्यासाठी वापरून पाहिली जावी, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
या अंतिम सामन्यात पहिल्या दिवसापासून सातत्याने पावसाने खेळ वाया गेला आहे.
सामन्याच्या एकूण चार दिवसात केवळ 141 षटकांचाच खेळ झाला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव पूर्ण झाला. त्यानी पहिल्या डावात 217 धावा केल्या. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडचा डाव सुरू झाल्यावर सातत्याने पावसाने व्यत्यय आणला आहे.
आता राखीव दिवस धरून सामन्याचे केवळ दोनच दिवस असून त्यात दोन्ही संघांचे दोन्ही डाव पूर्ण करणे शक्य नसल्याने हा सामना अनिर्णित राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच फुटबॉल व टेनिच्या धर्तीवर सामन्याचा निकाल लावा व तीच पद्धत पुढील काळात होत असलेल्या सामन्यांसाठी निश्चित करा, असा सल्लाही गावसकर यांनी दिला आहे.