कोलकाता – एका सभेत तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलेत लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. २०१५ मध्ये झालेल्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलेत लगावणाऱ्या देवाशीष आचार्य याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
देवाशीष याला मिदनापूर येथील तोमलुक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी देवाशीष याची हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे.
रुग्णालयातील रेकॉर्डनुसार सकाळी ४.१० मिनिटांनी देवाशीष याला दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारपर्यंत देवाशीषचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी रात्री देवाशीष आपल्या तीन मित्रांसोबत मोटरसायकवर फिरायला गेला होता. त्याने मित्रांसोबत सोनापेटा टोळनाक्यावर चहा घेतला होता. त्याचवेळी त्याला एक फोन आला होता. त्यानंतर तो मित्रांना सोडून निघून गेला होता.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देवाशीषच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देवाशीषनं 2020 मध्ये भाजपात प्रवेश केला होता.
२०१५ मध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलेत लगावल्यानंतर देवाशीष चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केलं होतं. मात्र अभिषेक बॅनर्जी यांनी हस्तक्षेप करत त्याला सोडून देण्याची सूचना केली होती. त्यानंतर देवाशीष बाहेर आला होता.