लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रावळपिंडीतील रिंग रोड प्रोजेक्टमधील कथित भ्रष्टाचारामध्ये मुख्य दोषी असल्याने त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बझदार यांनाही अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रावळपिंडीतील रिंग रोड प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात एका तथ्य-शोध समितीने भूसंपादन प्रक्रिया बेकायदेशीर ठरविली आहे. आरोपींनी रावळपिंडीचे आयुक्त मुहम्मद मेहमूद यांना 2.3 अब्ज रुपयांची जमीन अनावश्यकपणे खरेदी करणे तसेच काही प्रभावशाली लोकांच्या मालकीच्या आठ खासगी गृहनिर्माण संस्थांना फायदा करून दिल्याचा ठपकाही समितीने ठेवला आहे.
या संदर्भात पुढील चौकशी करण्याची गरज नाही. पुरावे लोकांसमोर आहेत. हे सर्व पंतप्रधान इम्रान खान आणि पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्या निर्देशानुसार घडले असल्याने त्यांना अटक केली पाहिजे, असे मरियम म्हणाल्या. इम्रान खान यांनी यापूर्वी साखर आणि पीठाच्या अनुदान घोटाळ्यामध्ये जे प्रकार केले आहेत, त्याचीच पुनरावृत्ती केली आहे. दलाली घेऊन अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याची त्यांची नेहमीची सवय असल्याचा आरोपही मरियम यांनी केला.
पंतप्रधानांनी यावर्षी 4 फेब्रुवारीला रिंग रोड प्रकल्पातील बदलांना मान्यता दिली होती आणि त्यानंतर त्याबाबत चौकशीचे आदेश दिले होते, हा हास्यास्पद विरोधाभास असल्याचेही मरियम म्हणाल्या.