नवी दिल्ली – कोरोनामुळे यंदा सीबीएसई-१२वीची परीक्षा होण्याची शक्यता नाही. जूनमध्ये सरकार यावर निर्णय घेईल. मात्र, तज्ज्ञांच्या मते स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अनिश्चित काळापर्यंत वाट पाहता येणार नाही. यामुळे मुलांमध्ये नैराश्य येईल.
सीबीएसईचे माजी चेअरमन अशोक गांगुलींच्या मते, जुलैपर्यंत एक तर परीक्षा रद्द करावी; किंवा सुरक्षित वातावरण असेल तर जुलैमध्ये परीक्षा घ्यावी व ऑगस्टमध्ये निकाल जाहीर करावा. सप्टेंबरपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर अभ्यासक्रमांचे सत्र सुरू होऊ शकेल.
परीक्षेला पर्याय म्हणून मूल्यांकनाचे एक सूत्र ठरले पाहिजे. २०२१-२२साठीही मूल्यांकनाची व्यवस्था तयार ठेवावी लागेल. देशातील खासगी शिक्षण संस्थांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक पांडेय यांच्यानुसार, मूल्यांकनासाठी तत्काळ व्यापक चर्चा व्हावी.
जुलैपर्यंत वाट पाहिली तरी परीक्षा घेण्यासारखी स्थिती निर्माण होईलच असे नाही. जरी परीक्षा घेतली तरी तीन महिने विलंब झालेला असेल. यामुळे पुन्हा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेशाच्या अडचणी निर्माण होतील. या स्थितीत सरळ परीक्षा रद्द करून दोन महिन्यांत निकाल देण्याचा प्रयत्न करायला हवा. मूल्यांकन हा मर्यादित पर्याय आहे. परीक्षा प्रक्रियांत सुधारणांची आता गरज आहे.
गांगुली म्हणतात, परीक्षा झाल्या तर विद्यापीठांतील प्रवेश व्यवस्थाही बदलेल. आतापर्यंत गुणांवर प्रवेश होत. आता सिस्टिम ऑफ सलेक्शन करावे लागेल. १०वी-१२वीच्या निकालास ५०% वेटेज आणि उर्वरित ५०% वेटेज विद्यार्थ्यांच्या क्षमतेला द्यावे लागेल.
एनसीईआरटीचे माजी संचालक जे. एस. राजपूत यांच्यानुसार, आता एक तर परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ नयेत किंवा परीक्षा कशा घेतल्या जाव्यात यावर चर्चाही नको. खरे तर या काळात प्रत्येक माणूस सुरक्षित राहील याची काळजी घेण्यावरच लक्ष केंद्रित करावे.