नवी दिल्ली, दि.11 –आतापर्यंत देशातील 7 केंद्रीय दलांमधील 271 जवान आणि अधिकाऱ्यांची प्राणज्योत करोना संसर्गाने मालवली. ती संख्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) सर्वांधिक म्हणजे 108 इतकी आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या केंद्रीय दलांमधील बाधितांची संख्या 71 हजार 295 वर पोहचली आहे. त्यातील 61 हजार 560 बाधित आतापर्यंत बरे झाले आहेत. सीआरपीएफमध्ये सर्वांधिक 20 हजार 700 बाधितांची नोंद झाली. त्याखालोखाल सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) 19 हजार 800 हून अधिक जवान आणि अधिकाऱ्यांना करोनाबाधा झाली. त्या दलातील 66 जवान प्राणांस मुकले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) 16 हजारांहून अधिक जवानांना करोनाची लागण झाली. त्यातील 61 जण दगावले. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील (आयटीबीपी) अनुक्रमे 17 आणि 14 जवानांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 4 जवान करोनाबाधेने मृत्युमुखी पडले. तर, नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) एका जवानाचे करोना संसर्गाने निधन झाले. संबंधित केंद्रीय दलांमधील लसीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्या दलांच्या सदस्यांचा समावेश आघाडीच्या करोनायोद्ध्यांमध्ये करण्यात आला आहे.