आग्रा – उत्तर प्रदेशमध्ये पंचायत समितीच्या निवडणुका चार टप्प्यात पार पडल्या. त्यात नऊ कोटी मतदार रांगेत होते. तर या प्रक्रियेसाठी 12 लाख सरकारी कर्मचारी सेवेत होते. त्यामुळे 30 जानेवारी 2020 ते चार एप्रिल 2021 या 15 महिन्याच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये सहा लाख 30 हजार करोना बाधित सापडले होते. तेच चार एप्रिलनंतरच्या अवघ्या 30 दिवसांत नव्या आठ लाख बाधितांची नोंद झाली. हा सर्व काळ ग्रामीण भागातील निवडणुकांच्या धामधुमीचा होता.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दोन आणि तीन एप्रिलला भरल्यानंतर स्थानिक नेत्यांनी आपला प्रचार सुरू केला. मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन, घेतलेले मेळावे आणि मिरवणुकांचे चित्र निर्माण झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई आणि दिल्लीतून लाखोंच्या संख्येने नागरिक उत्तर प्रदेशात आले. 15, 19, 26 आणि 29 एप्रिलला मतदान झाले. त्यानंतर दोन मे रोजी मतमोजणी सुरू झाली त्यानंतर आणखी तीन दिवस ग्रामीण भागातील जनता विजयोत्सवासाठी रस्त्यावर उतरली होती.
या काळात निवडणूक सेवेत असणाऱ्या 700 शिक्षकांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचा आरोप शिक्षकांच्या संघटनेने केला. त्यानंतर निवडणूक आयोगाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. या काळात शेकडोंच्या संख्येने उमेदवारही मरण पावले. त्यात काही विजयी उमेदवारही होते.
या निवडणुकीच्या काळात एका मोठ्या ताकदवान महत्वाच्या पक्षाने बुथपातळीवर पोहोचण्यासाठी गावा- गावात पक्षाच्या 50 हजार बैठका घेतल्या. हा सीलसीला मार्च महिन्यापासून सुरू होता. त्यांचा हा धडाका पाहून अन्य पक्षही या प्रवाहात सामील झाले. साथीच्या या प्रकोपात या निवडणुका घेतल्याबद्दल टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद उच्च न्यायलयाच्या आदेशाकडे बोट दाखवले. मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीच्या आदेशाला स्थगिती मागण्याचा मार्ग खुला होता, मात्र ते त्यांनी केले नाही, याकडे टीकाकार लक्ष वेधत आहेत.
आग्रा शहरात निवडणुकीनंतर बाधितांची संख्या पाचपट वाढली एक ते 15 एप्रिल पर्यंतच्या काळात आरोग्य खात्याकडील नोंदीनुसार एक हजार 612 बाधित होते. ती संख्या निवडणुकीनंतर आठ हजार 119 वर जाऊन पोहोचली. पहिल्या पंधरवड्यात करोनामृतांची संख्या केवळ सहा होती ती 15 ते 30 एप्रिल या दुसऱ्या पंधरवड्यात 81 वर गेली.
बरेलीत आठपट वाढ
बरेलीमध्येही निवडणुकीनंतर बाधितांच्या संख्येत आठपट वाढ नोंदवण्यात आली. दररोज 750 बाधित सापडू लाले. 16 ते 30 एप्रिल या काळात 12 हजार 500 बाधित सापडले. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. रंजन गौतम यांनीही निवडणुकीनंतर करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे मान्य केले