चेन्नाई – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले असून, राज्यातील सरकारची सूत्रे अद्रमुक पक्षाकडून द्रमुक पक्षाकडे गेली आहेत. द्रमुक पक्षाने येथे कॉंग्रेस व डाव्या पक्षांशी आघाडी केली होती. हा यूपीए आघाडीचा भाग मानला जातो. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मात्र, द्रमुक पक्षाला एक्झिट पोलमध्ये जितक्या प्रमाणात बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो मात्र प्रत्यक्षात उतरला नाही. द्रमुकला दोन तृतीयांश बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात द्रमुकला मिळालेले यश माफक स्वरूपाचे आहे.
भारतीय जनता पक्षाने या राज्यात सत्तारूढ अद्रमुक पक्षाशी युती केली होती. पण त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले आहे. भाजपचे या राज्यातील अस्तित्व याही वेळी नगण्यच राहिले. तथापि, अद्रमुक आघाडीने पराभूत होऊनही येथे जी लक्षणीय लढत दिली ती कौतुकास्पद ठरली आहे. जयललितांच्या निधनानंतर हा पक्ष येथे प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरा गेला.
पक्षाच्या दोन गटांमध्ये मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी एकजूट घडवून आणली होती. उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील दुसरा गटही या निवडणुकीत पलानीस्वामी यांच्या गटाशी एकरूप होऊन लढला होता. तथापि, सतत दहा वर्षे सत्तेवर असलेल्या अद्रमुक पक्षाला ऍन्टिइकंबन्सीचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.
एम करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुक पक्षाची सारी सूत्रे त्यांचे पुत्र स्टॅलिन यांच्या हाती गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही पहिलीच स्वतंत्र निवडणूक होती. आता स्टॅलिन हे बऱ्याच राजकीय संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. या निवडणुकीत अभिनेते कमल हसन यांनीही आपले नशिब अजमावले, पण ते एकटे वगळता त्यांच्या पक्षाला अन्य कोणतीही जागा मिळाली नाही.
कमल हसन यांचा या निमित्ताने राज्याच्या विधानसभेत प्रवेश झाला आहे. काही मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली असली तर मोठा राजकीय फोर्स निर्माण करण्यात कमल हसन यांना अपयश आले आहे. सुपरस्टार रजनीकांत या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी अपेक्षा होती. पण प्रकृतीचे कारण देत त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कमल हसन यांच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. पण त्यांना येथे फार चमकदार कामगिरी नोंदवता आली नाही.