पंढरपूर – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली. भाजपच्या समाधान आवताडे यांना 109450 मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना 105717 मते मिळाली.
पंढरपुरात भारतीय जनता पक्षाला निवडणून दिलं. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक त्याच्यासोबत राहीले. भारतीय जनता पार्टी आणि सर्वजण एकत्रित काम करत होते. आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला. हा विजय विठ्ठलाला समर्पित, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वेळ आली तर राज्यातील सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण सध्या कार्यक्रम हा कोरोनाचा करायचा आहे. सध्या सरकार नाही तर कोरोनाकडे आमचे लक्ष आहे, असेही फडणवीस म्हणाले.
बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु
बंगाल हा कम्यूनिष्टमुक्त आणि कॉंग्रेसमुक्त झाला. पश्चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे. आता उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. ते दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे कॉंग्रेसची काय अवस्थ झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे कॉंग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ममता यांनासुद्धा निवडून येण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे फक्त बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची लोकप्रियता कमी झाली असे म्हणता येणार नाही. या पराभवाचे केंद्रीय नेते विश्लेषण करतील. आम्ही आसाममध्ये जिंकलो आहोत. पदुच्चेरीमध्ये जिंकलो आहोत.
मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार : आवताडे
जेवढे मताधिक्य मिळायला हवं होतं, त्यापेक्षा कमी मतं मिळाली. पण जनतेने दिलेले कौल आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडी सरकारचे बहुतांश मंत्री येथे आले होते. मात्र आम्हाला विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप आणि प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, मोहिते पाटील, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम शिंदे यांनी साथ दिली. या मतदारसंघाचा आतापर्यंत विकास राहिला होता. येथे पाण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे. यानंतर आता या मतदासंघाच्या विकासासाठी प्रयत्न करु, असे समाधान आवताडे म्हणाले.