मुंबई – कोव्हॅक्सिन या करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने महाराष्ट्र सरकारला येत्या सहा महिन्यांत 85 लाख डोस देण्याची तयारी दर्शवली असल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला यासंदर्भात पत्र पाठवले होते. भारत बायोटेकने त्याला उत्तर देताना येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्राला करोना लसीचे 85 लाख डोस देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पण त्यासाठी भारत बायोटेकने ऍडव्हान्स पेमेंट करा, अशी मागणीही केली आहे.
भारत बायोटेकने महाराष्ट्र सरकारच्या पत्राला उत्तर देताना म्हटले आहे की, राज्याला मे महिन्यात पाच लाख डोस देऊ शकतो. सरकार याच्या माध्यमातून लसीकरण अभियानाचा तिसरा टप्पा सुरू करू शकते. यासाठी 600 रुपये प्रति डोस यानुसार दर आकारले जातील व काही रक्कम अगोदर द्यावी लागणार आहे.
मे महिन्यात पाच लाख तर जून आणि जुलै महिन्यात 10 लाख डोसचा पुरवठा महाराष्ट्र सरकारला केला जाईल. त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 20 लाख डोसचा पुरवठा करू, असे भारत बायोटेकने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालाही पत्र पाठवले होते, याचसंदर्भात माहिती देत उत्तर देत सीरम इन्स्टिट्यूट 20 मे पर्यंत लस देऊ शकणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.