कराड – केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत असल्याचे ऑक्टोबरमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सांगितले. पण प्रत्यक्षात तसे झाले नसल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना “भारताने करोनाला कसे हरवले’ असे सांगत स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा केलेला हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत. आज मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरवस्थेला जबाबदार असलेले आरोग्यमंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.