कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान येथे आयोजित प्रचार रॅलीत बोलताना मोदी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
ममता बॅनर्जी केंद्रीय यंत्रणांविरोधात कार्यकर्त्यांना भडकावण्याचं काम करत आहेत. दीदी तुम्हाला राग काढायचा तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पहिल्या चार टप्प्यात तृणमूल कॉंग्रेसचा पराभव झाला आहे, असा दावा मोदींनी केला. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांचा एकदा पराभव झाला की, त्या परत कधीच निवडून येणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसचा एकदा पराभव झाल्यानंतर ते परत आले नाहीत. वामपंथी, डाव्यांचा पराभव झाल्यानंतर तेही पुन्हा निवडून आले नाहीत. त्यामुळे दीदी, तुम्ही एकदा गेलात की परत येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी ममतांना लगावला.
त्याचबरोबर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. दीदी आणि त्यांचे कार्यकर्ते बंगालमधील अनुसूचित जातीतील आमच्या बांधवांना शिव्या घालत आहेत. त्यांना भिकारी संबोधत आहेत. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वीच दीदी आणि त्यांच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप मोदींनी केलाय.
गेल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानानंतर 92 जागा जिंकण्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आतापर्यंत 4 टप्प्यात झालेल्या मतदानानंतर भाजप 92 पेक्षा जास्त जागा जिंकेल. दीदी आपल्या भाषणात बंगालपेक्षा माझंच नाव अधिक घेतात. त्या जेवढ्या शिव्या मला देतात त्याचा हिशेब नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.