नवी दिल्ली – देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी कालच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेवर चर्चा झाली. तेव्हा त्यांनी हे भाष्य केले.
देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आहे. देशात पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालीय. काही राज्यात चिंताजनक स्थिती असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. मात्र देशाने करोना संसर्गाची पहिली लाट पार केली आहे. दुसरी लाट पहिल्यापेक्षा प्रभावी आहे. सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. यावेळी देशातील नागरिकही पहिल्यापेक्षा जास्त बिनधास्त बनले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधानांनी या बैठकीत मांडले. करोनाला रोखण्यासाठी जनतेच्या भागिदारीसह आपले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आजही त्याच ऊर्जेने काम करत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
करोना रोखण्यासाठी आपल्याला मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचेही मोदी म्हणाले. यावेळी आपल्याकडे करोनाशी लढा देण्यासाठी सर्व उपाय उपलब्ध आहेत. आता कोरोना प्रतिबंधक लसही आहे. त्यामुळे लॉकडाऊनला आपली अनुकूलता नसेल असेच त्यांनी सूचित केले आहे.