पुणे – युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम तथा बा. सी. मर्ढेकर यांनी त्यांच्या काळाच्या पुढची कविता लिहिली होती. आपण सर्व जण सध्या त्या काळात वावरतो आहोत. त्यामुळे मर्ढेकरांच्या कवितेला समजून घ्यायचे असेल, तर ती कविता आजच्या पिढीपर्यंत सक्षमपणे पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. कविता, संगितिका, कादंबऱ्या आणि सौंदर्यविचार या मर्ढेकरांच्या सर्वस्पर्शी साहित्याचा सम्यक अभ्यास करुन त्यांचे एक सुफळ संपूर्ण व्यक्तिचित्र आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन कवी पत्रकार आणि मर्ढेकर स्मारक समितीचे सदस्य श्रीनिवास वारुंजीकर यांनी केले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे कोरेगाव येथील डी. पी भोसले कॉलेजच्या मराठी विभागाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या तसेच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्हद्वारे वारुंजीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वारुंजीकर बोलत होते. यावेळी त्यांनी मर्ढे, जि. सातारा येथे लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या मर्ढेकर स्मारकाविषयीसुद्धा माहिती दिली. प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के तसेच डॉ. प्रकाश दुकाळे, डॉ. विजयसिंह सावंत आणि डॉ. रमेश साळुंखे या मान्यवरांनी या व्याख्यानासाठी संयोजन मार्गदर्शन केले.
वारुंजीकर पुढे म्हणाले की, मर्ढेकरांचा काव्यलेखनाचा कालखंड हा जागतिक स्तरावरील उलथापालथींनी भरलेला होता. पहिले आणि दुसरे महायुद्ध, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, छोडो-भारत आंदोलन, देशाची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, त्यानंतरचा नरसंहार, ऐतिहासिक मोठे स्थलांतर आणि गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगली या सगळ्याचा एकत्रित परिणाम मर्ढेकरांच्या लेखनात दिसतो. सुरुवातील युरोपियन रोमॅंटीसिझमची वाट चालणारी मर्ढेकरांची कविता नंतर आक्रमक आणि बिभत्स रसाकडे गेली कारण ती खरीखुरी समकालीन कविता होती, असे वारुंजीकर यांनी सांगितले.
मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्रीय विचार आणि वाड्मयीन महात्म्यासंबंधीचे विचारही चौकटीबाहेरचे होते असे सांगून वारुंजीकर शेवटी म्हणाले की, मर्ढेकरांच्या इंग्रजी कविता, नाट्यलेखन आणि कादंबऱ्या यातून होणारे त्यांचे साहित्यिक दर्शन विलोभनीय असेच आहे. अश्लीलतेच्या आरोपांच्या दिव्यातून सहिसलामत बाहेर पडलेली ही कविता खऱ्या अर्थाने जागतिक कविता म्हणून गणली जाईल.