आंबेगाव (पुणे) – भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आणि जीवनाचे सारस्वरुप असणारी भगवद्गीता सर्वसामान्यांना समजेल-उमजेल अशा मराठी भाषेत आणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे मराठी जनांवर मोठे ऋण आहे. त्यामुळे विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण ज्याप्रमाणे “मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा अभिमान दिन म्हणून साजरा का करु नये, असा प्रश्न कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी उपस्थित केला आहे.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेंट्रल लायब्ररीच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिन आणि डॉ. सी. व्ही. रमण स्मृती राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी वारुंजीकर बोलत होते. यावेळी विज्ञान दिनानिमित्त प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. व्ही. के. चौधरी यांचेही भाषण झाले. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. के. लोखंडे, ग्रंथपाल प्रद्मजा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात वारुंजीकर यांनी मराठी राजभाषा दिन आणि गौरव दिन यातील फरक सांगितला. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे लाभ काय आहेत, तेही विषद करुन सांगितले. मराठी भाषा मराठी माणसानेच जपायची आहे; त्यासाठी अन्य कोणी प्रयत्न करणार नाही, यावरही त्यांनी भर दिला. तसेच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्दासाठी त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत अनोखा शब्दखेळही घेतला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या व्याख्यानात व्ही. के. चौधरी यांनी विज्ञान शिकवताना आता मातृभाषेचा आधार घेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर भर दिला. प्रास्तविक डॉ. व्ही. के. लोखंडे यांनी केले. प्रा. वैशाली लिमये यांनी आभार मानले. मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.