पिंपरी – केंद्र सरकारने देशातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करावे. या लस सर्वप्रथम देशातील नागरिकांना देऊन उर्वरित लस इतर देशांना विकाव्यात. अथवा, मदत म्हणून द्याव्यात. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात याव्यात, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, करोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर आहे. त्याचा प्रसार अत्यंत जलद गतीने होत आहे.
लस निर्माण करणाऱ्या कंपन्या तसेच सरकारतर्फे देशातील नागरिकांना जास्तीत जास्त लस देण्यावर भर द्यायला हवा. मात्र, बाहेरच्या देशातील नागरिकांना लस पुरविण्यात येत आहे. देशातील नागरिकांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. त्यासाठी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लसींचे उत्पादन दर दिवशी किती होते, यावर नियंत्रण ठेवले गेले पाहिजे.
राज्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रथम टप्प्यात येणारे ज्येष्ठ नागरिक, आरोग्य सेवक, फ्रन्टलाइन वर्कर आदींना तत्परतेने लस द्यायची गरज आहे. जवळपास 20 ते 25 लाख लस प्रत्येक आठवड्याला केंद्र सरकारने राज्य सरकारला पुरविण्याची नितांत गरज आहे.