पेठ, दि. 9 – शाळेत जायचं वय नसताना मुळाक्षरे, बाराखडीची पुसटशी ओळख शिक्षकांकडून झाली नसतानाही जगातील सर्व देश व त्यांच्या राजधान्यांची माहिती, जागतिक घटना व सामान्यज्ञान सहज तोंडपाठ, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या प्रांजल उध्दव चव्हाण हिने वयाच्या चौथ्या वर्षीच महाराष्ट्रातील सर्वात अवघड गड किल्ले शिवनेरी, चावंड, हडसर, नारायणगड व हरिश्चंद्रगड सर केले आहेत.
ट्रेकरची पंढरी असणारा हरिश्चंद्रगड व महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर तारामती शिखर (उंची 1431 मी.) सर करणारी सर्वांत कमी वयाची मुलगी म्हणून आपलं नाव कोरणारी प्रांजल उद्धव चव्हाण ही मूळची लातूर जिल्ह्यातील; पण तिचे वडील सरकारी कर्मचारी (कामगार तलाठी) म्हणून आंबेगाव व सध्या जुन्नर तालुक्यात कार्यरत आहेत. प्रांजल 3 वर्षांची असतानाच तिने शिवनेरी सर केला. त्यानंतर चावंड व हडसर किल्लेही तिने सर केले आणि नंतर हरिश्चंद्रगड व त्यावरील महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे उंच 1431 मीटरचे तारामती शिखर सर केले.
हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी चव्हाण यांनी पाचनई मार्गे जाण्याचे ठरवले. 27 फेब्रुवारीला सकाळी 10 च्या सुमारास प्रांजल व इतर पाच जण यांच्या सोबतीने ते निघाले. नारायणगाव ते पाचणई हे अंतर सुमारे 90 कि. मी. आहे. दुपारी 2 च्या सुमारास हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी सुरुवात केली.
पाचणईपासून हरिश्चंद्रगड सुमारे 3 कि. मी. आहे.
जाताना घनदाट जंगल त्यातून जाणारी वाट दगड गोट्याची, तीव्र उतार व अवघड चढण, एका बाजूने उंच कडा तर दुसऱ्या बाजूने खोल दरी व घनदात जंगल असल्याने खूप काळजीपूर्वक एक एक पाऊल टाकत जावे लागते. सुमारे 3 तास पायपीट केल्यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास प्रांजल व त्यांचे सोबती हरिश्चंद्रगडावर पोहोचले. हरिश्चंद्रगडावर पोहोचल्यानंतर प्रांजलचे पाय चालून चालून सुजले होते, तरी पण तेथून जवळपास 1 कि. मी. अंतरावर असणाऱ्या कोकण कड्याचे दर्शन करण्यासाठी तिने इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या तेथील सूर्यास्त दर्शन घेऊन रात्री मुक्कामासाठी मंदिराजवळ तंबू भाड्याने घेऊन राहिले.
तारामती शिखरावर जायचे म्हणून हे चिमुकली पहाटेच 4 वाजताच उठली आणि 4.40 ला ती शिखरावर जाण्यास निघाली. घनदाट अरण्यातून वाट काढत बॅटरीच्या प्रकाशात अत्यंत सावधतेने एक एक पाऊल टाकत शिखर चढत होते. या अरण्यात वाघ, रानडुक्कर व जंगली प्राण्याचे प्रमाण अधिक आहे.
जवळपास तासभराची पायपीट करून 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.45 मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे उंच असणारे शिखर सर करणारी प्रांजल सर्वात कमी वयाची मुलगी म्हणून नोंद केली. प्रांजलला किल्ले पर्यटनासाठी तिची आई दीपाली चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले. पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे.