मुंबई – सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सोमवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अर्थसंकल्पातील तरतुदीवरून टीका टीप्पणी झाली. मात्र आज अधिवेशनात मनसुख हिरेन आणि खासदार मोहन डेलकर यांची संशयास्पद मृत्यू प्रकरणे गाजली. यावरून वाद होत असताना दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी सखोल तपासाची मागणी केली.
आम्हाला केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा योग्य तपास होईल, अशी अपेक्षा मोहन डेलकर यांच्या पुत्राने व्यक्त केली. तसेच मोहन डेलकर यांना गेल्या १६ महिन्यांपासून त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही डेलकर कुटुंबीयांना केला.
तत्पूर्वी आज सभागृहात डेलकर आत्महत्ये प्रकरणावरून वादविवाद पाहायला मिळाले. खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला होचा. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी देशमुख यांचे दावे फेटाळून लावत महाविकास आघाडी सुडाचे राजकारण करत असल्याचं म्हटलं होतं.