सर्वसाधारणपणे कोणत्याही भारतीय घरात दिसते तशीच लगबग “मैं कौन हूँ?’ या फिल्ममध्ये सुरुवातीला दिसते. लगबग म्हणजे अर्थात घरातल्या गृहिणीची. बाकी सगळे निवांत आहेत. तिचा नवरा अजून लोळतोय आणि सासरा हातात पेपर घेऊन सगळ्या घरावर म्हणजे घरातल्या सुनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. अमृता कश्यप कुकर लावते. नाश्ता तयार करते. मग पुन्हा दुपारच्या जेवणाची तयारी. नवऱ्याचा व स्वतःचा डबा. ती चांगली नोकरी करतेय. तिलाही ऑफिसमध्ये वेळेवर पोचायचेय. नवरा अविनाश स्वतःचे आवरून, डायनिंग टेबलवर येऊन बसतो. सासरा पेपर घेऊन येतो. दोघे गप्पा मारत नाश्त्याची वाट पाहतायत. ही नाश्ता वाढत उशीर झाल्याबद्दल सॉरी म्हणते. अविनाशचा डबा देते त्याला. दोघांना चहा देते. अविनाश भराभरा खाणेपिणे करतो, डबा घेतो आणि अमृताकडे एकदाही न बघता, तिच्याशी शब्दही न बोलता बाहेर पडतो.
अमृताची भूमिका मनीषा हिने केली आहे तर अविनाशचा आपल्यापुरते पाहण्याचा स्वभाव हेमंतकुमार याने यथातथ्य उभा केला आहे. अविनाश गेल्यावर ही एकटीच घाईघाईनं नाश्ताचहा करते. टेबल आवरते. आणि डबा घेऊन ऑफिसला निघते. सासरा तिच्या टापटीप कपड्यांकडे पाहत म्हणतो, “जरा सैल कपडे घालत जा सूनबाई, पुरुषांची नजर वाईट असते. त्यांनी टिंगलटवाळी केली तर आपल्याच घराण्याची इज्जत जाते.’ या फिल्मचे दिग्दर्शन राजाराम मुखर्जी यांचे आहे. सासऱ्याच्या वागण्याबोलण्यातून दिग्दर्शक स्पष्टपणे दाखवून देतो की, चूक पुरुषांची आणि त्याचे खापर मात्र बाईच्या माथी मारले जाते.
सुनेला त्यांचे हे वागणेबोलणे नेहमीचेच असणार. ती शांतपणे त्यांना जेवण, औषधे यांबद्दल सांगते आणि निघते. ऑफिसमधले आव्हानात्मक काम, सगळे कौशल्य पणाला लावून पुरे करते. मनात मात्र सारखे असे विचार की, “मी एवढी हुशार, काय झाले माझे हे? घरच्यांकडून प्रेम नाही, सहानुभूती नाही, समजून घेणे नाही. कोणासाठी मी एवढी राबते आहे?’ ऑफिस सुटते. धक्के खात लोकलमधून दमूनभागून ती घरी येते.
घरी एक पार्सल आलंय तिचं. सासरा म्हणतो, “हे बघ सूनबाई, अविनाश एवढे कष्ट करून पैसे कमावतो. ते असे ऑनलाइन शॉपिंगवर घालवत नको जाऊस तू.’ ती हिरमुसते. म्हणते, “अविनाशचा वाढदिवस आहे आता. त्याच्यासाठीच मागवली होती ही भेटवस्तू. आणि पापाजी, मीही थोडंफार कमवते. मी देईन माझ्या पैशातून याचे पैसे.’ त्यावर सासरा म्हणतो, “घरातलेच देतेस ना पण पैसे हे?’ लहानलहान संवादांवरून घरातल्यांचा दृष्टिकोन लक्षात येतो. अविनाश जे पैसे कमावतो, ते मात्र तो फार कष्ट करून कमावतो. आणि हिची कमाई म्हणजे घरचेच पैसे! बाईला किती गृहीत धरलं जातं!
घरी अविनाश येतो, तो फणफणतच. ऑफिसमधल्या सहकाऱ्यावर चिडलेला. अमृता स्वतःचा मूड विसरून त्याला धीर देते. तू हुशार आहेस, मेहनती आहेस. याचेही चीज होईल. तू आता चांगला मूड ठेव. मी छान काहीतरी खायला करते म्हणते. पण हा तिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निघून जातो. खाणेचहा होते. हा रागातच. अमृता मनातून वैतागते. त्याला सौम्यपणे म्हणते, “मलाही कधीतरी विचारत जा, तुझा दिवस कसा गेला?’ पण तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वडिलांशी गप्पा मारत बसतो.
रात्रीचे जेवण झाल्यावर सगळी झाकपाक, आवराआवर करून उशिरा अमृता बेडरुममधे येते. अविनाश लोळत पडलेला. ती त्याला म्हणते, “तुला माहितेय, मी कथ्थक नृत्य उत्तम करते. मला वाटतंय, सगळी कामं करून मी जरा माझ्या आवडत्या नृत्याकडे लक्ष द्यावं. काही व्हिडिओ क्लिप्स काढून यूट्यूबवर टाकते. मला शिकवायलाही आवडेल.’ हा तिरसटून म्हणतो, “आपल्या घरात असली नाचगाणी चालत नाहीत.’
ती थोडा वेळ गप्प राहते. मग म्हणते, “तुझीही चिडचिड होते. ऑफिसमधल्या कामानं दमतोस तू. तुला निदान सुटीच्या दिवशी तरी विश्रांती मिळते. मला तर तशी कधीच मिळत नाही. आपण थोडे दिवस बाहेरगावी जाऊन फिरून येऊ यात का?’
पण अविनाश कशावरच विचार करीत नाही. तिच्याशी तुसड्यासारखं बोलतो आणि थोड्याच वेळात झोपी जातो. नाईलाजानं अमृताही झोपते. मनात सारखे विचार. किती दिवस असा अन्याय सहन करायचा? स्वप्नात दुर्गादेवी येते. असुरांचा नाश करणारी. कोणाला न भिणारी. ही सकाळी उठते. सगळे आवरते. आणि तिचे कथ्थक नृत्य करता येईल असे गाणे ती लावते. देवीची मूर्ती समोर ठेवते. हळूहळू नृत्यात दंग होऊन जाते. काहीतरी मनासारखे करता येतेय याचा आनंद तिच्या नृत्यातून दिसू लागतो. गाण्याचा आवाज ऐकून अविनाश व तिचा सासरा जिना चढून वर येतात. खिडकीतून पाहतात, तर त्यांना नृत्यात मग्न झालेली अमृता दिसते. दोघेही चकित. इथेच ही फिल्म संपते. तिला आपल्या “स्व’चा शोध लागलेला आहे. आंतरिक शक्ती उमगली आहे. कर्तव्य पार पाडून स्वतःचा आनंद शोधणं आणि तो मिळवणं म्हणजेच तर स्त्री-स्वातंत्र्य!
माधुरी तळवलकर