उदयकांत ब्राह्मणे
कोरेगाव भीमा -सध्या करोनाचे भय वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनसाठी खळबळ सुरू झाली आहे. तसे नियम पाळण्याबाबत संकेतही आठ दिवसांच्या मुदतीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांकडून सोशलचा नारा अन् करोनाला मारा, अशा उखाण्यांतून जनजागृती सुरू झाली आहे. परंतु प्रशासनाबरोबरच नेटकऱ्यांकडून होत असलेल्या आवाहनाला नागरिकांमधून किती दुजोरा मिळतो हे मात्र अनुत्तरीतच आहे.
शहरासह गावागावांत करोनाची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्याबाबत गावागावांत नियमांवली लागू करण्यात येत आहे. विनामास्क फिरणायांवर कारवाईसाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. पुणे शहरासह शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, बारामती तालुक्यात सध्या दंडात्मक कारवाई सुरू आहे. तर सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांमधून जनजागृती, प्रबोधनही होत असल्याची प्रकारही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
सुरवातीच्या काळात करोनाचा सर्वच नागरिकांना फटका बसला आहे. करोनामुळे अनेकजण अद्यापही बेरोजगार आहेत. करोनाची संख्या वाढत असल्यामुळे गावागावातील नागरिक किराणा भरण्यासाठी गर्दी करु लागल्याचेही चित्र शिरूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. एकीकडे अनेकजण रोजगाराच्या शेधात आहेत. तर दुसरीकडे करोना संख्या वाढू लागल्यामुळे नागरिकांना धास्ती लागली आहे. त्यासाठी नागरिकांना करोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. सध्या करोनावर लस उपलब्ध झाल्यामुळे नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते.
सोशलचा गैरवापर करणाऱ्यांवर वॉच
अफवा पसरवणे गुन्हा आहे. सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा गैरवापर करणाऱ्यांवर यापूर्वीही वारंवार कारवाई झाली आहे. सोशल मीडियावर अफवा निर्माण करून त्याचा प्रसार करणाऱ्या पोस्टवर पोलिसांकडून सतत लक्ष ठेवले जाते. सायबर पोलीस कक्षाकडून सोशल मीडियावरील अफवा, पोस्टसंदर्भात बारीक लक्ष ठेवण्यात येते. सर्व पोस्टची शहानिशा करुन त्याप्रमाणे पुढील कारवाई निश्चित केली जाते. त्यामुळे नेटकऱ्यांनीही आता जरा सावधान राहण्याची गरज आहे.
नेटकऱ्यांकडून उखाण्यांतून जनजागृती
हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात, करोनाला हरवायला, बसा घरात मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर अन् माहेर, सगळ्यांनी मास्क घालूनच पडा घराबाहेर शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून, रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टन्सिंग राखून शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा, रोगप्रतिकार शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा ताजमहल, कुतूबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट, लक्षण दिसली करोनाची तर डॉक्टरांना भेटा थेट काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले, करोनामुळे इतर सगळे आजार विसरले चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ, आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ, चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप, डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप, काळजी घ्या, सुरक्षित राहा अन् करोनाला हरवा…