मुंबई, – शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, ठाकरे सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. यापूर्वी आंदोलने झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानसपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा नेते गिरीश महाजन, रणजित पाटील यांनी आज (गुरुवार) आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
फडणवीस म्हणाले, मुळात जो निर्णय आमच्या सरकारच्या काळात झाला आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद सुद्धा झाली, ती केवळ हे सरकार अंमलात आणत नाही. म्हणून शिक्षकांसारख्या घटकावर आंदोलनाची वेळ येणे आणि त्यांना इतके दिवस बसवून ठेवणे हे दुर्दैवी आहे. नुसत्या अंमलबजावणीला सव्वा वर्ष लागतो? मुंबईच्या बिल्डरांना 5 हजार कोटी रुपयांची सूट आणि शिक्षकांसाठी 300 कोटी खर्च करायला तयार नाही, हे खेदजनक आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
तसेच, विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहोत, जर हा प्रश्न सोडवला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा देखील फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला. आंदोलनास भाजपाचा 100 टक्के पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
हे घाबरट सरकार
राज्य सरकारकडे प्रचंड बहुमत असताना सरकार घाबरत का आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहत आहे. हे घाबरट सरकार आहे. नियमावलीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल आधी तारीख ठरवून पाठवतात. ती निवडणूक सिक्रेट बॅलटने होते. पण काही दिवसांमधल्या चर्चा पाहिल्यास हे सरकार आपल्याच आमदारांना घबरत असल्याचे दिसत आहे. आपला उमेदवार पडतोय की काय, याचीच सरकारला जास्त भिती आहे, असे फडणवीस म्हणाले.