नवी दिल्ली – अर्थसंकल्प सादर झाल्यापासून म्हणजे सोमवारपासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत. या सहा दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5,063 अंकांनी म्हणजे जवळजवळ 11 टक्क्यानी वाढला आहे.
या काळात शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 16,70,154 कोटी रुपयांनी वाढून ते आता 2,02, 82,798 कोटी रुपयांवर गेले आहे. आज सेन्सेक्स प्रथमच 51 हजार अंकांच्या पुढे बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी प्रथमच 15 हजार अंकाच्या पुढे बंद झाला.
भारतातील कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीत चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने करवाढ न करता पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करायचे ठरविले आहे. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदराबरोबरच परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्यामुळे निर्देशांक वाढत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंग या संस्थेचे विश्लेषक अजित मिश्रा यांनी सांगितले.
भारतात लॉक डाऊनच्या काळामध्ये डिमॅट उघडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता हे गुंतवणूकदार गुंतवणुकीचे प्रयोग करू लागले आहेत. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांचा पाया विस्तारित झाला असल्याचे दिसून येते.