मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. यावरून आता केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकार आमने-सामने आले आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संतापलेल्या फडणवीसांनी म्हटले की, हे संतापजनक आहे. कुठ गेला मराठीबाणा, महाराष्ट्रधर्म ? असा सवाल करत भारतरत्नांची चौकशी करणारे रत्न देशात शोधून सापडणार नाही. या कृतीचा निषेध करावा तेवढा थोडा असल्याचे म्हणत सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का, असा संतप्त सवाल फडणवीसांनी केला आहे.
भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असंही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलिब्रेटींनी केलेल्या ट्विटबद्दल शंका व्यक्त केली होती. यावर विरोधकही चांगले तापले असून, मोदी सरकार या कलाकारांवर दबाब टाकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.