नगर (प्रतिनिधी) – कोविड-19 वरील लसीकरणाचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यात नगर जिल्ह्यात 12 केंद्रांवर लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी 871 जणांनी लस टोचून घेतली. त्यापैकी तीन परिचरिकांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
महापालिका रुग्णालयातील दोघींचा व जिल्हा रुग्णालयातील एकीचा त्यात समावेश आहे. काल दुपारी लस घेतल्यानंतर रात्री उशिरा दोघींना, तर आज सकाळी एकीला त्रास सुरू झाला. थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे, असा त्रास त्यांना होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहे.
लस घेतलेल्या या तिन्ही परिचारिकांना रात्री उशिरा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. ज्यांनी लस घेतली, अशा अन्य सर्वच जणांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
डॉ. सुनील पोखरणा,
जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर
जिल्ह्यात एकूण 21 लसीकरण केंद्र असून, त्यापैकी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय तसेच महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र, अशा 12 केंद्रांवर ही मोहिम सुरु होती. जिल्ह्यात 1 हजार 200 जणांना लस देण्यात येणार होती. मात्र, प्रत्यक्षात 871 जणांनी ही लस घेतली.
लस घेतलेल्यांना त्रास होऊ लागल्यास त्यांच्यासाठी जिल्हा रुग्णालयात 12 खाटांचा खास कक्ष उभारण्यात आलेला आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच दर तासाला ते रिपोर्टिंग करतील, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिल्या आहेत. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास बेड वाढविण्यात येतील, असे जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. आज लसीकरण बंद असून, यापुढे एक दिवसाआड लस देण्यात येणार आहे.