शिंदे वासुली (पुणे) – वासुली (ता. खेड) येथील जी. ई. कंपनीत बुधवारी (दि. 23) एक सांबर शिरले होते. त्याला पाहण्यासाठी बघ्यांची झालेली गर्दी आणि कंपनीमध्ये सुरू असलेल्या मशिनरीमुळे सांबरला धोका पोहोचण्याची भीती होती. त्यातच सांबर सैरावैरा पळत असल्याने थोडे जखमी झाले होते. अखेर वनविभागाने अथक प्रयत्नातून ताब्यात घेतले आणि त्याच्यावर उपचार करून त्यास करंजविहिरे येथे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
भामचंद्र डोंगर व परिसरात डोंगर जवळच भामा आसखेड जलाशय असल्याने परिसरात मोठमोठी झाले असून हा विस्तिरण असा पसरलेला आहे. त्यामुळे या घनदाट झाडांच्या परिसरात कायमच वन्यप्राणी आढळून येतात. मात्र, वाढत्या औद्योगिकरणामुळे ही झाडे नष्ट होत असल्याने प्राण्यांचे नैसर्गिक स्थानाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे भरकटून सांबार मानवीवस्तीत आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जी.ई.इंडिया कंपनी साधारणतः 24 एकर क्षेत्रात वसलेले आहे. कंपनीस आर.सी.सी. वॉल कम्पाउंड आणि त्यावर तारेचे कुंपण असलेने सांबराला बाहेर पडण्यास अन्य मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याला रेस्क्यू करणे गरजेचे होते. चाकण वनपरिक्षेत्र वनअधिकारी योगेश महाजन यांनी तातडीने कार्यवाही करत जुन्नर उपवनसंरक्षक जयारामे गौडा, सहायक वनसंरक्षक एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड, मंचर येथील वनाधिकारी, बावधन पुणे येथील रेस्क्यू टीम चाकण आणि खेड येथील प्राणीमित्र आणि सर्पमित्रांच्या सहकार्याने बचाव कार्य सुरू केले.
अखेर पाच ते सहा तासांच्या अथक परिश्रमानंत सायंकाळच्या सुमारास नर सांबराला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केले. यावेळी माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर आणि वनसेवक कोकणे यांनी बचावकार्य यशस्वी करण्यात मोलाचे काम केले.