पाचगणी (प्रतिनिधी) – सातारा- महाबळेश्वर रस्त्यावर आज दुपारी बाराच्या सुमारास केळघर गावापुढील आंबेघर येथे वेण्णा नदीवरील ( रामजी बुवा पूल ) पुलावरून चारचाकी कार नदीमध्ये कोसळल्याने एक जणाचा जागीच मृत्यू झाला. त्या गाडीतील अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत .
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी . आज दुपारी बाराच्या सुमारास महाबळेश्वरवरून साताराकडे जाणारी कार ( एमएच 20 सीएस 9787) आंबेघर येथील वेण्णा नदीवरील पुलावरून सरळ नदी पात्रात कोसळली. या अपघातात चालक जागीच ठार झाला. या गाडीत एकूण पाच जण होते यापैकी अमित जोशी (वय ४२) हा मरण पावला.
समरजीत बशरे (वय १७), संकेत पाटील (वय१६), यशराज पाटील (वय१८), आयुष शेडगे (वय १७, सर्व रा. औरंगाबाद) जखमी आहेत. हे सर्व जण महाबळेश्वरला फिरायला आले होते व आज सातारामार्गे घरी निघाले असता वाटेत ही दुर्घटना घडली. चालक अमित जोशी याने गाडीतून उडी मारल्यामुळे तो गाडीखाली आल्यामुळे मृत झाल्याचे जखमींनी सांगितले.
दरम्यान, मेढा पोलिसांना जोशी यांचा म्रुतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जखमींना उपचारासाठी मेढा येथे नेण्यात आले आहे .