नवी दिल्ली – अॅडलेड येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सर्वात सुमार कामगिरी केली. त्यामुळे बीसीसीआय देखील अत्यंत संतप्त झाली आहे. त्यामुळेच संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना जबाबदारीने खेळ करा, अन्यथा काय करायचे ते बीसीसीआय ठरवेल, अशा शब्दांत बीसीसीआयने त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
बीसीसीआय व भारतीय संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना संदेश पाठवला आहे. हे दोन्ही खेळाडू फक्त कसोटी क्रिकेट खेळतात. पहिल्या कसोटीत अजिंक्यने 42 व 0 तर, पुजाराने 43 व 0 धावा केल्या होत्या.
आता तर विराट कोहलीच्या गैरहजेरीत रहाणेकडे नेतृत्व दिले जाणार आहे. अशात संघ व्यवस्थापनाने संघातील या दोन वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट शब्दांत संदेश दिल्याचे समजते.
रहाणे आणि पुजारा यांना दुसऱ्या डावात त्यांच्याकडून अपेक्षित असलेली कामगिरी करता आली नाही. या दोघांनी पुढाकार घेऊ जबाबदारीने खेळावे, अशा शब्दांत कठोर संदेश देण्यात आला आहे.