कोलकाता – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असला तरी विकासाच्या सर्व निकषांमध्ये आमच्या सरकारने उत्तम कामगीरी केली आहे असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अमित शहा यांनी आपल्या बंगाल दौऱ्यात उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याला त्यांनी आज सविस्तर उत्तर दिले.
त्या म्हणाल्या की अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. जेव्हा ते एखादा दावा करतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेशी आकडेवारी आणि तथ्य असले पाहिजे. पण त्यांच्या सर्व आरोपांना आमच्याकडे प्रत्युत्तर आहे असे नमूद करीत त्यांनी आज पत्रकार परिषदेत आपली आकडेवारी सादर केली. त्या म्हणाल्या की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार आमच्या राजवटीत राजकीय हत्या व अन्य गुन्हेगारी कमी झाली आहे.
आमच्या सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांनी उत्तर्रपदेशातील हाथरस येथील घटनेबाबत उत्तर द्यावे असे आव्हानही त्यांनी दिले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोलकाता शहराला दोन वेळा सर्वात सुरक्षित शहर असा किताब मिळाला आहे असा दावाही त्यांनी केला.