कोल्हापूर – राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांची माहिती व्हावी म्हणून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी “किसान आत्मनिर्भर यात्रा” सुरू करण्याची घोषणा केली आहे.
येत्या 24 डिसेंबरपासून ही आत्मनिर्भर यात्रा सुरू होणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ते कोल्हापूरच्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
येत्या 24 डिसेंबरपासून ही किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू होणार असून या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे.
या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणारी ही यात्रा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये केंद्राने केलेल्या कृषी कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देणार आहे. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत, असेही खोत यांनी सांगितले.